जळगाव | प्रतिनिधी:
चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी गावात शेतीच्या वाटणीवरील दीर्घकालीन वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चरणसिंग वजेसिंग जाधव (वय 42) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने शेवटच्या क्षणी आपल्या भावाला फोन केला, मित्रांना WhatsApp मेसेज पाठवला आणि खिशात आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी ठेवून जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवार, दिनांक 3 जून रोजी रात्री घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, जामदा शिवारातील शेतीच्या वाटणीवरून मृत चरणसिंग आणि त्याचे दोन काका तसेच चुलते भाऊ यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. न्यायालयीन निर्णयानंतर संबंधित शेतीच्या सातबारा उताऱ्यावर दोन्ही काकांची नावे लागली होती. त्यानंतर त्यांनी चरणसिंगला शेतात येण्यास सक्त मनाई केली होती. एवढेच नव्हे, तर त्याला मारण्याच्या धमक्याही वेळोवेळी दिल्या जात होत्या. या मानसिक त्रासामुळे चरणसिंग पूर्णपणे खचून गेला होता.घटनेच्या दिवशी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास चरणसिंगने आपल्या भावाला फोन करून स्पष्ट शब्दांत सांगितले की, “काका आणि त्यांच्या मुलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतो आहे.” यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी पाठवली. या मेसेजनंतर भाऊ चेतन जाधव आणि त्याचे मित्र त्याच्या शोधासाठी शेताकडे धावले. दुर्दैवाने, शेताच्या बांधावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत चरणसिंग मृतावस्थेत आढळून आला.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चरणसिंगच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही आढळून आली, ज्यामध्ये त्याने स्पष्टपणे आपल्यावर होणाऱ्या मानसिक छळाची माहिती दिली होती. यावरून पोलिसांनी वजेसिंग जाधव, शांताराम जाधव, प्रतापसिंग जाधव, जगदीश जाधव आणि किरण पाटील यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास चाळीसगाव पोलीस करीत आहेत.
भावाच्या डोळ्यादेखत अशा प्रकारे भाऊ हातातून निघून गेल्याने चेतन जाधव यांचा हंबरडा फोडला. परिसरातील नागरिकही या घटनेने हादरून गेले आहेत. एकीकडे कुटुंबातील वाद, दुसरीकडे न्यायालयीन निर्णय आणि त्यातून उद्भवलेला मानसिक तणाव — याच्या भोवऱ्यात अडकून एका तरुणाने जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.









