सांगली | प्रतिनिधी –
कृष्णा नदीच्या स्वच्छता आणि प्रदूषणमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयतु कृष्णे’ अभियानाला मोठे यश मिळाले आहे. या अभियानाचे संस्थापक राकेश दड्डणावर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नदीच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची विनंती निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात कृष्णा नदीच्या काठावर साठणारे प्लास्टिक, सांडपाणी, औद्योगिक घाण आणि घरगुती कचऱ्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ दखल, जलसंपदा विभागास निर्देश
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना कार्यवाहीसाठी निर्देश दिले आहेत. याशिवाय त्यांनी ‘जयतु कृष्णे’ अभियानाच्या कार्याची प्रशंसा करत, भविष्यात शासनस्तरावर सहकार्य करण्याचा वचनबद्ध पाठिंबा दिला आहे.
हजारोंचा सहभाग; कृष्णामाई स्वच्छता रॅली ठरली लोकचळवळ
सांगलीत अलीकडेच झालेल्या ‘भव्य कृष्णामाई स्वच्छता रॅली’मध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. या रॅलीच्या माध्यमातून नदी स्वच्छतेबाबत लोकजागृतीचा मोठा संदेश पोहोचवण्यात आला. यामुळे ही मोहीम निव्वळ सामाजिक उपक्रम न राहता लोकचळवळीचा रूप धारण करू लागली आहे.
‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यस्तरीय मान्यता मिळावी – राकेश दड्डणावर
“ही मागणी केवळ पर्यावरण रक्षणासाठी नाही, तर अस्मितेचा मुद्दा आहे,” असे सांगत दड्डणावर यांनी ‘जयतु कृष्णे’ अभियानाला ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यस्तरीय मान्यता मिळावी, अशी जोरदार मागणी केली. त्यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचेही सुचवले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्याच भेटीत रॅलीचे कौतुक करत “ही जनजागृती महत्वाची आहे,” असे सांगितले आणि पुढील टप्प्यात सहकार्य करण्याचे संकेत दिले.









